शनिवार, २१ ऑगस्ट, २०१०

अपना सपना मनी मनी..............?

आज सकाळी ऑफिसला निघाले होते. माझा नेहमीचा ड्रायव्हर सुटीवर गेल्यामुळे त्याने दिलेल्या बदली ड्रायव्हर बरोबर गप्पा मारत होते. त्याच्या बरोबर झालेला हा संवादः
मी: किती वर्ष आहात बहारिनमधे?
तो: सहा वर्षं झाली.
मी: एकटेच असता का कुटुंबही असतं बरोबर?
तो: एकटा नाही, बायको, मुलंही असतात इथे.
मी: चांगलं आहे. एकटं रहायचं आणि ते ही परदेशात......खूप कठीण जातं.
तो: हो ना. आणि मला सांगा, आपण आयुष्यभर कुटुंबासाठी राब राब राबायचं आणि
त्यांच्यापासून दूर आपणंच एकटं रहायचं? काय मजा? आपलं आयुष्यं ते किती! आजकाल कधी काय होईल याचा भरवसा नाही. असं असताना आहे ते आयुष्यं आनंदात जगायचं! उद्याची जास्त चिंता करायची नाही.
मी: हं, बरोबर आहे. पण कुटुंबाला घेवून इथे रहाणं पैशाच्या दॄष्टीने सगळ्यांनाच परवडतं असं नाही ना?
तो: हो, ते ही बरोबर आहे. पण पैसा पैसा किती करायचं? आपल्यासाठी पैसा कि पैशासाठी आपण?

(असं म्हणून त्याने मला जो प्रसंग सांगितला तो अंगावर काटा आणणारा होता......)

तो: माझा एक मित्रं होता. एकटाच रहात असे इथे. बायको, मुलं केरळमधे. दर महिन्याला मिळणार्‍या पगारातला महत्त्वाचा हिस्सा त्यांना पाठवत असे. उरलेल्या पैशात काटकसरीने रहात असे. स्वत:च्या खाण्यापिण्याकडे लक्षं नाही. त्यातल्या त्यात स्वस्तं मिळेल ते (मग ते अबर्-चबर का असेना.....) खात असे. दर ३-४ वर्षांनी एकदा केरळला जात असे. बर्‍यापैकी पैसा जमवला होता. केरळला घरही बांधलं होतं. आम्ही त्याला नेहमी सांगायचो की इतका पैशामागे लागून काय मिळवणार आहेस तू? जरा स्वत:कडेही लक्षं दे. खाण्यापिण्याची आबाळ करू नकोस. नीट रहा. पण आम्हाला उडवून लावत असे नेहमी. एकदा तो असाच केरळला जाणार होता. बायकोला, मुलांना भेटण्यासाठी. सगळी तयारी झाली होती. पण सुटीवर जायच्या आधी २ दिवस त्याला massive heart attack आला..... मीच त्याला हॉस्पिटल मधे घेवून गेलो. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरने सांगितलं की आम्ही याला वाचवू शकत नाही. भरीत भर म्हणजे त्याचं BP सुद्धा वाढलं आणि ब्रेन हॅमरेज झालं..... आणि शेवटी तो गेला..... काय मिळवलं त्याने पैसा-पैसा करून? स्वत: त्याचा कधीच उपभोग घेऊ शकला नाही.... आता त्याच्या कुटुंबाला कोण आधार देणार?

त्याने सांगितलेला प्रसंग ऐकून क्षणभर छातीत धस्सं झालं.... आणि तेव्हाच काही दिवसांपूर्वी घडलेला दुसरा प्रसंग माझ्या डोळ्यासमोर तरळून गेला.

माझी कलीग मला सांगत होती. तिच्या मुलाला बरं नव्हतं. लंगडत चालत होता. चांगला बास्केट बॉल खेळणारा मुलगा, पण पायामुळे सगळं बंद होतं. ती त्याला डॉक्टरकडे घेऊन गेली. डॉक्टरने पायाला विश्रांती द्यायला सांगितली आणि त्याचबरोबर एक विशिष्टं प्रकारचं बँडेज वापरण्याचा सल्ला दिला. हिने ३-४ दुकानांत चौकशी केली. ७०० रुपयांपासून-१५०० रुपयांपर्यंत वेगवेगळी किंमत तिला सांगितली. तिने आमच्या ऑफिसमधे
चौकशी केली की हे आमच्या मेडिकल पॉलिसीमधे कव्हर होतं का? तिला नाही हे उत्तर मिळालं. झालं..हिने बॅंडेज घेण्याचा निर्णय पुढे ढकलला. मी हे सगळं ऐकून अवाक! गेली १९-२० वर्ष ती बहारिनमधे रहातेय. नवरा-बायको दोघं नोकरी करतात. तरीही १५०० रुपयांच्या बॅंडेजसाठी एवढा चिकटपणा? मी न रहावून तिल विचारलं, "अगं तुला पैसे महत्त्वाचे की तुझ्या मुलाचा पाय?" यावर ती पटकन म्हणाली, "अगं, आणखी १० दिवसांतच मी आठवडाभरासाठी मुंबईला जाणार आहे तेव्हा तिकडे बघेन स्वस्तात मिळतं का ते!" मनातल्या मनात मी डोक्यावर हात मारला आणि आमचा संवाद जास्त न वाढवता तिथून चालती झाले..

तेव्हापासून माझ्या डोक्यात एकच विचार घुमू लागला- आपण पैसा का कमावतो? पैशासाठी आपण की आपल्यासाठी पैसा?

पैशाची बचत, गुंतवणूक करणं, आपला पैसा कसा वाढेल ते बघणं, आपल्या निवॄत्तीनंतर कोणाच्या तोंडाकडे न बघता, स्वावलंबीपणे जगता यावं इतका पैसा गाठीशी असणं हे सगळं बरोबर आहे. किंबहुना ते मह्त्त्वाचंही आहे. पण म्हणून नको तिथे चिकटपणा का? स्वत:वर, आपल्या मुलाबाळांवर पैसा खर्च नाही करायचा तर कुठे खर्च करायचा? आपल्या आरोग्यापेक्षा, आनंदापेक्षा पैसा महत्त्वाचा असतो का? आणि पैसा पैसा करताना आपल्यालाच डाव अर्ध्यावर सोडून जावं लागलं तर त्या पैशाचा काय उपयोग आहे? ही पैशाच्या मागे धावणारी लोकं म्हणजे आधुनिक गझनीचे महमूदच नाहीत का? आज जगात सगळीकडेच वातावरण इत़कं अस्थिर आहे की माणसाला उद्याचा भरवसा रहिलेला नाही. दररोज कुठल्या ना कुठल्या नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीला तोंड देत लोक जगत आहेत. कधी दहशतवाद्यांचा हल्ला, तर कधी बाँबस्फोट, कधी प्लेन क्रॅश, तर कधी चक्रीवादळ किंवा पूर. असं असताना आला दिवस साजरा करायचा सोडून काही लोक प्रत्त्येक क्षणी पैशाचा नको इतका विचार करून आयुष्यातल्या आनंदाच्या किती क्षणांना मुकत असतील?

त्यामुळेच मी मधे कुठेतरी ऐकलेलं वाक्यं आठवलं 'Money is not heart of life it's a part of life' आणि असं वाटलं की प्रत्येकजण हे लक्षात ठेऊन त्याप्रमाणे वागला तर किती छान होईल?