गुरुवार, १९ नोव्हेंबर, २००९

कहानी गुडिया की........

गुडिया..... एका सामान्य मुस्लिम कुटुंबातील सामान्य मुलगी. अगदी चारचौघींसारखी.....२०-२२ वर्षांची. भावी आयुष्याची स्वप्नं रंगविणारी.........तिचं लग्नं होतं सैन्यातील एका जवानाशी. मोठा दीर, जाऊ, सासू असं तिचं छान, सुखी कुटुंब असतं. लग्नानंतर जेमतेम १५-२० दिवसांत तिच्या नवर्‍याला सीमेवर रुजू होण्यासाठी बोलावलं जातं, युद्धाला तोंड फुटलेलं असतं.....तिचा निरोप घेऊन आणि लवकर परतण्याचं वचन देऊन नवरा जातो आणि........... आणि गुडियाचं आयुष्यं एक वेगळीच कलाटणी घेतं...... युद्धाच्या बातम्या रोज येत असतात. नवर्‍याची हाल हवाल तिला कळत असते. पण एक दिवस..........एक दिवस त्याची खबर येणं बंद होतं. त्याचा पत्ता काय... जिवंत आहे की मेला...काही कळेनासं होतं...आणि एक दिवस तो बेपत्ता असल्याचं सैन्यातून कळतं. गुडियाचं चित्तं थार्‍यावर रहात नाही.. पण गुडियाला आशा असते की तिचा नवरा आज ना उद्या नक्की सापडेल......पोलिस, सैन्यातील वेगवेगळे अधिकारी यांच्या ऑफिसचे खेटे घालणं सतत चालू असतं. पण कुठूनच तिच्या नवर्‍याचा काहीच पत्ता लागत नाही. असं करता करता ४ वर्ष जातात........तिचे आई-वडील आणि इतर नातेवाईक तिला दुसर्‍या लग्नासाठी सुचवू लगतात. पण तिचं मन तयार नसतं. पण शेवटी सगळ्यांचं ऐकून ती दुसर्‍या लग्नाला तयार होते. दुसरा संसार थाटते. त्यात रमते. घरातल्या सगळ्यांना आपलसं करते. थोडेच दिवसात ती आई होणार असल्याची चाहूल तिला लागते....पण नियतीला तिचं सुख मान्यं नसतं..... आत्ता कुठे खरर्‍या अर्थाने तिच्या आयुष्याची सुरुवात होत असते आणि तेव्हाच बातमी येते की तिचा आधीचा नवरा जिवंत आहे. त्याला युद्धकैदी म्हणून पकडलेलं असतं आणि ४ वर्षांनंतर पाकिस्तान सरकार त्याची सुटका करणार असतं......गुडीयाची मोठी विचित्र अवस्था होते. हसावं की रडावं तिला कळेनासं होतं. तिलाच काय तिच्या सासरच्या आणि माहेरच्या सगळ्यांपुढेच मोठं प्रश्नचिन्हं उभं राहतं. आता पुढे काय? आणि एक दिवस तिचा नवरा घरी परत येतो. गुडीयाच्या नावाने हाका मारून घरभर शोधू लागतो.. तो बेपत्ता झाल्याच्या धक्क्याने त्याच्या वॄद्ध आईचा मृत्यु झाला आणि बरेच दिवस त्याची वाट बघून गुडियाने दुसरं लग्नं केलं हे ऐकून त्याला धक्का बसतो. काहीही झालं तरी गुडियाला परत घेऊन येण्याचा तो चंग बांधतो. त्याचा भाऊ, वहिनी त्याला खूप समजावतात. तिचा सुखी संसार उद्ध्वस्त न करण्याची विनंती करतात. पण कशाचा काहीही परिणाम होत नाही.गावातले मुल्ला मौलवी यांची एक समिती नेमली जाते. कुठलाही निर्णय होई पर्यंत गुडियाला तिच्या आई-वडिलांकडे परत पाठवले जाते. आणि शेवटी तिने आपल्या पहिल्या नवर्‍याकडे परत जावे असा निर्णय दिला जातो. तेच धर्माला धरून असल्याचं सांगितलं जातं. गुडियाच्या मताला काडीइतकीही किंमत नसते. किंबहुना तिला ते कोणी विचारतच नाही. आणि शेवटी तिला हा निर्णय मान्य करावा लागतो. आपल्या मुलाला घेऊन ती आपल्या पहिल्या नवर्‍याकडे परत जाते. पण कशातच लक्षं लागत नसतं.या सगळ्याचा तिच्यावर मानसिक आणि शारिरीकही विपरीत परिणाम होतो. आणि एक दिवस आपल्या लहान मुलाला मागे ठेऊन ती य जगाचा निरोप घेते..... त्या मुलाला सांभाळण्याचा मोठेपणाही तिचा पहिला नवरा दाखवत नाही. आणि त्याच्या पालन-पोषणाची जबाबदारी गुडियाच्या म्हातार्‍या आई-वडिलांवर येते.यथावकाश तिचे दोन्ही नवरे दुसरी लग्नं करतात आणि आपापले संसार परत थाटतात.................गुडिया मात्रं धड कुठलंच सुख न उपभोगता समाजातल्या पुरुषी वर्चस्वाला आणि विचित्र रुढींना बळी पडते.............ही गोष्ट आहे 'कहानी गुडिया की......' या हिंदी चित्रपटाची. स्त्रीला एक माणूस म्हणून वागवण्याची, तिचं मन जाणून घेण्याची अजूनही या समाजातील काही जणांना गरज वाटत नाही हे हा चित्रपट बघून प्रकर्षाने जाणवतं.हा काही फार बिग बजेट चित्रपट वगैरे नाही किंवा फार मोठया कलाकारांना वगैरे घेऊन केलेलाही नाही. पण एका सत्यघटनेवर आधारित आहे. कुठे मिळाला तर जरूर बघा. फक्त गुडियाची गोष्ट जाणून घेण्यासाठी....................

३ टिप्पण्या:

  1. कथा माहीत आहे. पेपर मध्ये सुध्धा खुप काही वाचले आहे. परंतु सीनेमा बद्दल काही कल्पना नाही. केंव्हा लागला होता हा सिनेमा?

    उत्तर द्याहटवा
  2. कुठल्या थिएटरमधे नाही बघितला. आम्ही व्हिडिओ लायब्ररीमधून आणला होता.

    उत्तर द्याहटवा