गुरुवार, ११ जून, २००९

अस्तित्व

अरे अजित, ये ना आत ये। आमच्या विनंतीला मान देऊन जेवायला आलात खूप बरं वाटलं. अगं क्षमा तू पण ये. खरंच अजित आला खूप बरं वाटलं. तुला वाटेल मी काय मगासपासून अजित, अजित लावलंय? अगं पण तो आला म्हणजे तू येणार हे ठरलेलंच! त्यामुळे तो येणं महत्त्वाचं! तो आहे म्हणून तुझ्या इथे असण्याला अर्थ आहे. हो की नाही?

आम्ही एके ठिकाणी जेवायला गेलो होतो तिथे कानावर पडलेला हा संवाद। त्यांच्या घरात पहिलं पाऊल ठेवल्यापासून ती मुलगी नुसती ऐकत होती आणि हसून (खोटं??) त्यांच्या हो ला हो म्हणत होती. तिला ते म्हणणं कितपत पटलं होतं हे माहीत नाही पण माझ्या मनात मात्र विचारांची मालिकाच सुरु झाली होती.

वाटलं, कधी बदलणार ही मानसिकता? बायकांनाच जोपर्यंत असं वाटतं की फक्तं नवर्‍यामुळेच आपल्या अस्तित्वाला अर्थ आहे तोपर्यंत असे संवाद सारखेच ऐकू येणार।माझ्या मनात आलं, का? नवर्‍यामुळेच फक्तं बायकोच्या आयुष्याला अर्थ असतो का? मी हे सत्य अजिबात नकारत नाही की नवरा-बायकोचं नातं हे एक अतिशय सुंदर नातं आहे. दोघांच्या एकमेकांवरच्या प्रेमामुळे, एकमेकांना समजून घेण्यामुळे दोघांचं आयुष्यं समॄद्धं होतं, अर्थपूर्ण होतं. पण फक्तं नवर्‍यामुळेच बायकोच्या अस्तित्वाला अर्था आहे या मताशी मात्र मी बिलकुल सहमत नाही.

लग्नं हा मुलगा-मुलगी दोघांच्याही आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा। कारण दोघांचही आयुष्य त्यानंतर सर्वर्थाने बदलून जातं। पण मुलीला आपल्या आई-वडिलांचं घर आणि रोजच्या सवयीचं सारं काही सोडून जायचं असल्यामुळे तिच्या मनात धास्ती जरा जास्त असते. सासर अगदी पलीकडच्या गल्लीत असलं तरी एकदा का तुम्ही लग्नं होऊन दुसर्‍या घरी गेलात की सारं काही बदलतं. अशा परिस्थितीत नवीन घरात जुळवून घेऊन स्थिरवण्यासाठी सासू, सासरे, नवरा व घरातील इतर माणसांचा खूप मोठा सहभाग असतो. नवर्‍याचा सगळ्यात जास्त. त्यातून हे जर अरेंज्ड मॅरेज असेल तर मग आणखीनच! पण याचा अर्थ असा नाही की नवर्‍यामुळेच बायकोच्या अस्तित्वाला अर्थ असतो. तो ज्या गावी असेल तिथे तिला रहावं लागतं. तिथल्या परिस्थितीशी जुळवून घ्यावं लागतं. तो ज्या माणसांना आपलं मानत असेल त्यांना तिलाही आपलं मानून, त्यांच्यात मिसळावं लागतं. यात कुठे नवर्‍याचा मोठेपणा किंवा बायकोचा कमीपणा असतो असं म्हणणं चुकीचं आहे.

नवरा हा बायकोच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा, अतिशय महत्वाचा भाग असतो.पण एकमेव महत्त्वाचा? नक्कीच नाही!! कदाचित माझं हे विधान काही बायकांना पटणार नाही, उद्दामपणाचं वाटेल. पण माझी खात्री आहे की ज्या बायका आज घराबाहेर पडून काही करत आहेत, ज्यांच्या अनुभवांची आणि जाणिवांची क्षितिजं विस्तारलेली आहेत त्यांना ते नक्कीच पटेल।

हल्लीच्या मुली, मुलांच्या बरोबरीने शिकतात, अगदी परदेशी राहूनही उच्चशिक्षण घेतात। नोकर्‍या करतात, स्वत:चे व्यवसाय करतात. उच्चपदांवरही काम करतात. नवर्‍याच्या बरोबरीने अर्थार्जन करून संसाराला हातभार लावतात. लग्नानंतरही त्यांचा कल नोकरी आणि घर दोन्ही सांभाळण्याकडे असतो.नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय केल्याने साहजिकच मुलींचही स्वत:चं एक विश्व तयार झालेलं असतं. समाजात एक स्थान असतं. स्वतःची एक ओळख असते. हे स्थान किंवा ही ओळख त्यांनी स्वत:च्या कर्तॄत्वाने आणि मेहनतीने निर्माण केलेली असते. कोणाची बायको किंवा कोणाची मुलगी म्हणून नव्हे.असं असतानाही वरच्यासारखी विधानं ऐकू आली की मन अस्वस्थं होतं आणि बोलणार्‍या व्यक्तीचा राग न येता कीव येते.

आज आपण समाजात अशा कितीतरी विवाहीत स्त्रिया बघतो ज्यांनी आपल्या कर्तॄत्वाने सार्‍या जगाला आपली ओळख करून दिली आहे। किरण बेदी, चंदा कोचर, प्रतिभा पाटील, कल्पना चावला, शिखा शर्मा--या आणि अशा कितीतरी स्त्रिया स्वबळावर उच्च्पदांवर पोहोचल्या आहेत. मला सांगा, यातील एक तरी स्त्री अशी आहे का के जिच्या नवर्‍याची ओळख दिल्याशिवाय तिची ओळख आपल्याला पटणार नाही? मला इथे नवरा-बायकोमधील श्रेष्टत्वाचा वाद घालायचा नाही। दोघंही आपापल्या जागी महत्त्वपूर्ण भूमिका बजवतात. त्यामुळे, नवर्‍यामुळेच बायकोच्या अस्तित्वाला अर्थ आहे ही काही बायकांच्या मनातील समजूत अणि ती इतर बायकांच्या मनावर बिंबविण्याची त्यांची धडपड मला चुकीची वाटते.मी तर म्हणेन आजच्या प्रत्येक स्त्रीने स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. लग्नाआधी कोणाची तरी मुलगी आणि लग्नानंतर कोणाचीतरी बायको एवढीच आपली ओळ्ख सीमीत न ठेवता स्वत:मधल्या कलागुणांना, हुशारीला वाव मिळेल असं काहीतरी केलं पाहीजे.मग ही ओळख निर्माण करण्यासाठी उच्चशिक्षितंच असलं पाहिजे किंवा नोकरीच केली पाहिजे असं काही नाही. आज अनेक क्षेत्रं बायकांसाठी खुली आहेत. अनेक संधी खुणावत आहेत. त्याचा फायदा घेतला पाहिजे.खरं तर आपल्या कामामुळे चार जणं आपल्याला ओळखतात ही भावनाच खूप समाधान आणि खूप काही करण्याचा भरपूर उत्साह देऊन जाणारी आहे.

मला खात्री आहे की आपल्या समजातले सुजाण नवरेही याबद्दल काहीच आक्षेप घेणार नाहीत। उलट आपली बायको फक्त चूल आणि मूल याच्यात अडकून न पडता आणखी काही करू पहात आहे याचा कुठल्या समजूतदार नवर्‍याला अभिमान असणार नाही? याचा शेवट करताना John Conrad यांचं एकच वाक्यं लिहावसं वाटतं आणि सार्‍या स्त्रियांना विचारावसं वाटतं, बघायचं हे अनुभवून?

"I don't like work---but I like what is in work---the chance to find yourself, your own reality--for yourself, not for others-which no other man can ever know."

६ टिप्पण्या:

  1. छान आहे लेख. सहमत आहे तुमच्या विचारांशी. स्व अस्तित्वाचा शोध घेण्यास नुसतिच सहमती नाही तर प्रोत्साहनही देउ इच्छितो मी.

    उत्तर द्याहटवा
  2. तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

    श्रेया

    उत्तर द्याहटवा
  3. किती मनातलं बोललात. पण आज ही एकव्साव्या शतकांत हे असले अठराव्या शतकातले विचार ऐकले कि मन कुठे तरी खट्टू होतं. खरंच दोघांनी एकमेकांना समजून एकमेकांच्या गुणांचं कौतुक करण्यात अन् इतरानी ही ते मानण्यात केव्हढा आनंद आहे .

    उत्तर द्याहटवा
  4. आशाताई, तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. आपले विचार आणखीही काही जणांना पटलेत हे बघितलं की खरंच खूप बरं वाटतं. आणि मुख्य म्हणजे आपण अगदीच चुकीचा विचार करत नाही हे ही कळतं.

    उत्तर द्याहटवा
  5. श्रेया, सहमत आहे. मीही अनेकदा पाहते गं असे चित्र. बरेचदा पुरूषही बायकांच्या मनात असेच चित्र उभे करतात आणि काही बायकाही तसेच समजतात. आशा आहे ही मानसिकता कधीतरी बदलेल.

    उत्तर द्याहटवा
  6. थँक्स! नक्कीच आपण आशा करुया कि असे विचार कधीतरी बदलतील.

    उत्तर द्याहटवा